रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शहरातील सुमारे शंभर किलो ई-कचरा गोळा झाला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘गोगटे-जोगळेकर’कडून ई-कचरा आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानाला नगरपालिकेने सहकार्य केले आहे. गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेच्या कचरा गाड्या दोन ऑक्टोबरला शहरातून ई-कचरा गोळा करण्यासाठी फिरणार आहेत.
स्वच्छतेबाबत नागरिक जागरूक झाले आहेत. जैव विघटनशील, हानीकारक कचरा वेगवेगळा करून घंटा गाडीमध्ये दिला जातो. इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक कचरा घरात पडून राहतो. काही वेळा तो विघटनशील कचऱ्यासोबत दिला जातो. हा कचरा पर्यावरणाला घातक असल्याने महाविद्यालयाने पुढाकार घेऊन ई-कचरा गोळा करण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांनीही आपापल्या परिसरामध्ये आवाहन केले. त्यानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत महाविद्यालयात ई-कचरा गोळा झाला. मुंबईतील एनजीओ इकोरॉक्स या संस्थेसोबत महाविद्यालयाचा सामंजस्य करार झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कचरा सरकारमान्य संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
जमा झालेल्या कचऱ्यामध्ये बंद पडलेले मोबाइल, चार्जर्स, वायर्स, टीव्ही, कॉम्प्युटर, की-बोर्ड, हार्ड डिस्क आदी कचऱ्याचा समावेश आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी पालिकेच्या दोन गाड्या दोन ऑक्टोबरला शहरात फिरणार आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडे असलेला ई-कचरा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.